पुणे
मुंबई मेट्रोपॉलिटन कोर्टात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याविरुद्ध दाखल केलेला अब्रू नुकसानीचा दावा म्हणजे रिकामपणचा उद्योग असून यामध्ये प्रगल्भतेचा अभाव दिसत आहे,अशी प्रतिक्रिया एड.सतीश उके आणि ऍड.समीर शेख यांनी व्यक्त केली आहे.
बुधवारी पुण्यात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात या दोन्ही वकीलांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
६ सप्टेंबर २०१६ रोजी नागपूर मध्ये झालेल्या आर्किटेक्ट एकनाथ निमगडे खून प्रकरणाचा आरोपी हा भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी संबंधित असल्याचा आरोप करीत ऍड. सतीश उके व ऍड समीर शेख यांनी १९ मार्च २०२१ रोजी मुंबईत प्रेस कॉन्फरन्स घेतली होती, त्यामुळे व्यथित झाल्याचे सांगत ६ मे २०२१ रोजी फडणवीस यांनी मुंबई महानगर न्यायालयात अब्रुनुकसानीची तक्रार दाखल केली आहे, या संदर्भात पुढील सुनवाई ३१ मे २०२१ रोजी होणार आहे.
”सत्ता गेल्याने व करण्यासारखी कामे डोक्यात नसल्याने राज्याचे विरोधी पक्ष नेते रिकामे बसले आहेत, त्यामुळे “टाईमपास” करण्यासाठी माजी मुख्यमंत्री बालीशपणे असल्या रिकाम्या उद्योगाला लागले असावेत’, असे राष्ट्रवादी लीगल सेलचे प्रदेश सचीव ऍड समीर शेख यांनी म्हंटले आहे.
*माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पुणे आणि नागपूरच्या वकिलांविरुद्ध मुंबईच्या न्यायालयात अब्रूनुकसानीची तक्रार*
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या संदर्भात प्रेस कॉन्फरन्स घेणाऱ्या ऍड.सतीश उके, नागपूर आणि ऍड समीर शेख ,पुणे या दोन वकिलांच्या विरोधात मुंबई महानगर न्यायालयात अब्रुनुकसानीची तक्रार दाखल केली आहे.
मंगळवारी सदर तक्रारी संदर्भात पडताळणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी भाजप नेते देवेंद्र फडणवीस मुंबईच्या महानगर न्यायालयात स्वतः उपस्थित राहिले होते. त्यानंतर बुधवारी या दोन्ही वकीलांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
‘सदर तक्रार दाखल झाली असल्यास ती फडणवीसांची न्यायालयात उलटतपासणी करण्याची सुवर्ण संधी असेल’, असे ऍड सतीश उके यांनी म्हंटले आहे