पुणे:- पुण्यात सध्या सायंकाळी ६ ते सकाळी ६ दरम्यान लॉकडॉऊन सुरू आहे. राज्य सरकारच्या आदेशाची राज्यात अंमलबजावणी झाल्यास पुण्यातही लॉकडॉऊनची वेळ बदलली जाऊ शकते. मात्र, पुण्यातील परिस्थिती गंभीर असल्यामुळे वेळेत कोणताही बदल होणार नाही, असे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी स्पष्ट केले आहे. पुणे शहरात रविवारी नवे रुग्ण सुमारे ६२०० आढळले आहेत.
जिल्हा आणि पिंपरी चिंचवडमध्येही रुग्णसंख्या वाढती आहे. या पार्श्वभूमीवर राव म्हणाले, ‘‘पुणे जिल्ह्यात रुग्ण संख्या वाढती आहे. त्यामुळे सायंकाळी सहा ते सकाळी सहा दरम्यान लॉकडॉऊन करण्याच्या निर्णयात कोणताही बदल होणार नाही. पुण्यातील निर्णयाबाबत शुक्रवारी पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. त्या बैठकित आढावा घेतला जाईल. त्यानंतर परिस्थितीत काही बदल झाला तर, लॉकडॉऊनबाबत सुधारीत निर्णय घेतला जाईल.’’
रुग्णांना पुरेसे बेड उपलब्ध करून देताना प्रशासनाची सध्या दमछाक होत आहे. रुग्णसंख्या वाढत राहिली तर, त्यामुळे पुण्यात आखणी कडक निर्बंध लागू होऊ शकतात. या पाश्वभूमीवर राज्य सरकारने काढलेल्या आदेशात राज्यात रात्री संचारबंदी, दिवसा जमावबंदी असेल, असे म्हटले आहे.
पुणे वगळता राज्यात सकाळी 7 ते रात्री 8 जमावबंदी म्हणजे 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई राहील तसेच रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत कोणत्याही व्यक्तीस योग्य कारणाशिवाय बाहेर पडता येणार नाही. यातून वैद्यकीय व इतर अत्यावश्यक सेवा वगळण्यात येतील. किराणा, औषधी, भाजीपाला आदी जीवनावश्यक व आवश्यक वस्तू सोडून इतर सर्व प्रकारची दुकाने, मॉल्स, बाजारपेठा, 30 एप्रिलपर्यंत बंद राहतील.
अत्यावश्यक वस्तू व सेवांच्या दुकानातील दुकानदार व कर्मचाऱ्यांनी लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करावे तसेच स्वत: व ग्राहकांकडून नियमांचे पालन होते किंवा नाही ते पाहावे. सार्वजनिक व खासगी अशी सर्व प्रकारची वाहतूक नियमितपणे सुरूच राहील. रिक्षांमध्ये चालक व दोन प्रवासी, टॅक्सीमध्ये चालक आणि निश्चित केलेल्या प्रवाशांपैकी 50 टक्के प्रवासी प्रवास करू शकतील. सार्वजनिक व खासगी बसेसमध्ये उभे राहून प्रवास करता येणार नाही. आसनांवर बसलेल्या प्रवाशांनाच परवानगी आहे.
प्रवाशांनी मास्क घातलेला हवा. बस चालक, वाहक व इतर कर्मचारी यांनी आपले लसीकरण पूर्ण करावे किंवा कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र बाळगावे. बाहेरगावी जाणाऱ्या रेल्वेमध्ये सर्वसाधारण डब्यात उभ्याने प्रवासी असू नयेत तसेच प्रवासी मास्क घालतील याची काळजी रेल्वे प्रशासनाने घ्यायची आहे. खासगी कार्यालयांनी पूर्णपणे वर्क फ्रॉम होम करणे बंधनकारक राहील. केवळ बँका, स्टॉक मार्केट, विमा, औषधी, मेडिक्लेम, दूरसंचार, अशी वित्तीय सेवा देणारी तसेच स्थानिक आपत्ती व्यवस्थापन, वीज , पाणी पुरवठा करणारी कार्यालये मात्र सुरू राहतील, असे राव यांनी स्पष्ट केले आहे.