औरंगाबाद :- शहरात सध्या कोरोना संसर्गाने बाधित रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे यापुढे ज्या भागात कोरोनाचे रुग्ण अधिक आढळतील आणि गर्दी होत असलेल्या भागांमध्ये लॉकडाऊन लागू करण्याचा इशारा महापालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी मंगळवारी पत्रकारांशी संवाद साधताना दिला आहे.
औरंगाबाद शहरात कोरोना संसर्गाचा प्रादूर्भाव पुन्हा एकदा वाढू लागला आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. त्यामुळे कोरोनाला रोखण्यासाठी पालिकेकडून कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. सोबतच विविध उपाययोजना राबविल्या जात आहे. या पार्श्वभूमीवरच मंगळवारी आयुक्त पांडेय यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितले की, शहरात फेब्रुवारीच्या दुसर्या आठवडयापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 199 इतकी होती. मात्र तिसर्या आठवड्यात अचानकपणे बाधित रुग्णांची संख्या 199 ते 261 पर्यंत वाढली आहे.
मागील तीन महिन्यात सर्व व्यवहार सुरळीत झाले असून मंगल कार्यालय, शाळा, कोचिंग क्लासेसला परवानगी दिल्याने त्याचा परिणाम कोरोनाच्या रुग्ण वाढीवर झाला आहे. 19 फेब्रुवारी रोजी 143, 20 रोजी 126, 21 रोजी 184, 22 रोजी 104, 23 रोजी 219, 24 रोजी 262 बाधित रुग्णांची संख्या शहरात वाढली आहे. मात्र गतवर्षी जी गंभीरता जाणवत होती, ती आता जाणवत नसल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.