मुंबई : सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या तपासावर भारतीय जनता पक्षाने प्रश्न उपस्थित केले आहेत. महाराष्ट्र भाजप नेते आशिष शेलार यांनीही या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे. सुशांतसिंग राजपूत प्रकरणात सीबीआय चौकशीची मागणी करताना ट्विटरवरून त्यांनी सांगितले की, ‘सुशांत प्रकरणात तथ्यांमध्ये अडथळे, काही प्रश्नांची उत्तरेच नाहीत.
या तपासावर प्रश्न चिन्ह लावताना आशिष शेलार म्हणाले की, ‘वांद्र्यातल्या भाईच्या एनजीओवर पैसे खाल्ल्याचा आरोप होता, परंतु पोलिस गप्प राहिले. दिग्दर्शकाची सुटका झाली, सीईओकडे चौकशी केली गेली. पोलिसांऐवजी गृहमंत्र्यांनी दररोज ब्रीफिंग घेतली. सुशांत सिंगच्या बहिणीनेही त्याच्या मैत्रिणीचे नाव घेतले, तरीही पोलिसांनी नाही म्हणत आहेत. सुशांतचे वडील म्हणतात की, त्याच्या बँकेतून कोट्यावधी रुपये गायब आहेत. मैत्रिणीला सीबीआय चौकशी हवी आहे, परंतु मंत्रालय नाही म्हणते. मुंबईतल्या युवा नेत्याचे नाव यात येते. सगळा गोंधळ! जे निष्पाप आहेत त्यांची चौकशी केली जात आहे आणि संशयित मोकळे फिरत आहेत.’ असे म्हणत त्यांनी या प्रकरणात सीबीआय चौकशी व्हायलाच हवी अशी मागणी केली आहे.





















































