पुणे :- जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हयात १० मार्च २०२१ रोजी घेण्यात आलेल्या फेरफार अदालतीला चांगला प्रतिसाद मिळाला असून एका दिवसात तीन हजार ९० नोंदी निर्गत करण्यात आल्या आहेत. नागरिकांना सर्व मंडळ स्तरावर सातबारा, आठ अ व फेरफारचे वाटप करण्यात आले आहे. असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी दिली.
शेतक-यांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत असलेल्या नोंदीचे, इकरार, बॅक बोजे, वारस तसेच खरेदीच्या नोंदीचे कामकाज मोठया प्रमाणावर प्रलंबित होते. महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक करणेसाठी राबविण्यात येणा-या महाराजस्व अभियानाचा भाग म्हणून प्रलंबित असणा-या विविध प्रकारच्या नोंदी मोहीम स्वरुपात निर्गत करण्यासाठी १० मार्च २०२१ रोजी जिल्हाभर फेरफार अदालतीचे आयोजन करण्यात आले होते.
अदालतीचे पर्यवेक्षण करण्यासाठी जिल्हास्तरावरुन संपर्क अधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या होत्या. संबधित संपर्क अधिकाऱ्यांमार्फत अशा फेरफार अदालतीचे परिणामकारक पर्यवेक्षण करण्यात आले. या फेरफार अदालतींच्या दिनांक व ठिकाणाविषयी गावोगावी व्यापक प्रसिध्दी देण्यात आली. या फेरफार अदालतीमध्ये विविध प्रकारच्या नोंदी निर्गत करणे आवश्यक कागदपत्रासह संबंधित पक्षकारांना बोलावून त्यांच्या प्रलंबित नोंदी या जागेवर निर्गत करण्यात आल्या आहेत.
हवेली- 328, पुणे शहर -6, पिंपरी चिंचवड- 436, शिरुर- 281, आंबेगाव- 145, जुन्नर- 196, बारामती- 480, इंदापूर- 199, मावळ- 175, मुळशी- 104, भोर- 89, वेल्हा- 31, दौड- 194, पुरंदर- 199, खेड- 227 अशा एकुण 3090 नोंदी निर्गत करण्यात आल्या.
फेरफार अदालतीसाठी मिळणारा नागरिकांचा प्रतिसाद पाहता अशा प्रकारच्या अदालती दर महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी नियमित व व्यापक प्रमाणात घेण्यात येणार आहेत. नागरिकांच्या नोंदी वेळेत निर्गत व्हाव्यात व तक्रार नोंदी तीन महिन्याच्या आत निकाली काढाव्यात व सातबारा संगणकीकरणात व अभिलेख अद्यावतीकरणात पुणे जिल्हा पहिल्या तीन क्रमांकामध्ये राहावा अशाप्रकारचे नियोजन येणा-या कालावधीत करावे,असे निर्देश सर्व जिल्हाधिकारी श्री.राजेश देशमुख यांनी दिले आहेत.