जागतिक सेवा क्षेत्रामध्ये पर्यटन व्यवसायाचे महत्वाचे स्थान असुन आपल्या आवडीनुसार पर्यटक विविध पर्यटन प्रकारांचा आनंद घेत असतात. विशेषतः भारतासारख्या कृषिप्रधान देशामध्ये कोरोना महामारीच्या काळामध्ये एकांत व शांतता असलेल्या ठिकाणी पर्यटकांचा ओढा वाढत आहे. त्यामुळे पर्यटकांना मनःशांती उपलब्ध करून देणाऱ्या कृषी पर्यटनाला भविष्यात चांगले दिवस असतील, असे प्रतिपादन *महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हरणे यांनी केले.*
जागतिक कृषी पर्यटन दिनानिमित्त पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या सांगवी येथील बाबुरावजी घोलप महाविद्यालयातील ट्रॅव्हल अँड टुरिझम मॅनेजमेंट विभाग व रिटेल मॅनेजमेंट विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी पर्यटनातील संधी या विषयावर आयोजित एक दिवसीय ॲानलाइन चर्चासत्रामध्ये मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
बाबुरावजी घोलप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांच्या हस्ते या चर्चासत्राचे उद्घाटन झाले. यावेळी डॉ. अर्जुन डोके, डॅा. नरसिंग गिरी, डॉ. राणी भगत आदी मान्यवर उपस्थित होते.
चर्चासत्राचे प्रास्ताविक करत असताना प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी सर्वप्रथम विद्यार्थ्यांना कृषी पर्यटनावर माहिती देण्याच्या उद्देशाने आयोजित चर्चासत्राचे उद्देश व महत्त्व स्पष्ट केले. तसेच कोरोना महामारीच्या काळामध्ये आंतरराष्ट्रीय पर्यटन ठप्प झालेले असताना शेतकऱ्यांना कृषी पर्यटनाच्या माध्यमातून पर्याय निर्माण झाला आहे याकडे लक्ष वेधत राज्य सरकारच्या कृषी पर्यटन धोरणावर प्रकाश टाकला. त्याचबरोबर घोलप महाविद्यालयामध्ये चालू असलेल्या पर्यटन व कृषी पर्यटन अभ्यासक्रम व त्यांचा भविष्यामध्ये विद्यार्थ्यांना होणाऱ्या फायद्याबद्दल थोडक्यात माहिती दिली.
कृषी पर्यटनातील संधी या विषयावर मार्गदर्शन करताना *महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हरणे यांनी सर्वप्रथम संयुक्त राष्ट्रसंघाने मान्यता दिलेल्या जागतिक कृषी पर्यटन दिनाच्या संकल्पनेबाबत माहिती देत जागतिक स्तरावरील कृषी व ग्रामीण पर्यटनाचे स्वरूप स्पष्ट केले.* तसेच कोरोना महामारीचा पर्यटन उद्योग व कृषी व्यवसायाला फटका बसला असताना कृषी पर्यटनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कसा आर्थिक फायदा होईल याबाबत सविस्तर विवेचन केले. त्याचबरोबर कृषी पर्यटनामधील संधीची माहिती देताना कृषी पर्यटन केंद्र चालू करण्यासाठी आवश्यक घटक, शासकीय धोरणे, महाराष्ट्रातील कृषी पर्यटन केंद्रे, कृषी पर्यटनासंदर्भात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ करत असलेले कार्य, प्रशिक्षण कार्यक्रम, विपणन कौशल्य इत्यादी घटकांवर उपस्थित विद्यार्थ्यांना विस्तृत माहिती दिली.
चर्चासत्रानंतर विद्यार्थ्यांनी कृषी पर्यटना विषयी विचारलेल्या विविध प्रश्नांना सविस्तर उत्तरे देत त्यांचे शंका निरसन केले.
यावेळी पर्यटन विभागातील विद्यार्थ्यांनी या चर्चासत्राद्वारे कृषी पर्यटन विषयक इत्यंभूत माहिती दिल्याबद्दल महाविद्यालयाचे आभार मानत बहुतेक विद्यार्थ्यांनी भविष्यामध्ये कृषी पर्यटन क्षेत्रामध्ये करिअर करण्याचा मानस असल्याची भावना याप्रसंगी व्यक्त केली.
सदर ॲानलाइन चर्चासत्राचे सूत्रसंचालन डॉ. नरसिंग गिरी तर आभारप्रदर्शन डॅा. अर्जुन डोके यांनी केले.
चर्चासत्राच्या यशस्वीतेसाठी प्रा. सोमीनाथ आव्हाड, प्रा. सद्दाम घाटवाले, प्रा. नागेश भालेराव, प्रा. रश्मी यादव, प्रणित पावले यांनी परिश्रम घेतले.
झुम ॲप व यु – ट्यूब लाइव्ह द्वारे पार पडलेल्या या चर्चासत्रामध्ये बाबुरावजी घोलप महाविद्यालयातील पर्यटन पदवी अभ्यासक्रम, कृषी पर्यटन प्रमाणपत्र अभ्यासक्रम व रिटेल मॅनेजमेंट विभाग तसेच अण्णासाहेब मगर महाविद्यालय, हडपसर व वाघिरे महाविद्यालय सासवड मधील पर्यटन अभ्यासक्रमाचे सुमारे २५० पेक्षा जास्त विद्यार्थी उपस्थित होते.
![भविष्यात कृषी पर्यटनाला चांगले दिवस: दीपक हरणे*](https://ppcnews.in/wp-content/uploads/2021/05/IMG-20210516-WA0024.jpg)
भविष्यात कृषी पर्यटनाला चांगले दिवस: दीपक हरणे*
Share this: