“पत्रकबाजी नव्हे, शहर विकासाचा खरा मुद्दा विसरला – सचिन काळभोर यांची टीका”
पिंपरी चिंचवड,(ppcnews.in)दि. 14 ऑक्टोबर:
चिखली-कुदळवाडीतील संशयास्पद कारवाई, वाकड टीडीआर घोटाळा, विकास आराखड्यातील आतबट्ट्याचे व्यवहार, कोट्यवधींच्या मोडलेल्या ठेवी, संशयास्पद निविदा, विकासकामांच्या वाटपातील रिंग, तसेच सुशोभीकरणाच्या नावाखाली चाललेला धंदेवाईकपणा — अशा गंभीर गैरप्रकारांवर सध्या टीकेची झोड उठली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी आयुक्त शेखर सिंह यांच्या बदलीपूर्वी मंजूर झालेल्या भांडवली कामे आणि टेंडरची माहिती मागवली आहे.
परंतु, या मागणीवरून आता नवे राजकीय वादळ उठले आहे. भाजपचे माजी शहर चिटणीस सचिन काळभोर यांनी तुषार कामठे यांच्यावर जोरदार टीका करत म्हटले की,

“आयुक्त शेखर सिंह हे प्रशासक असताना तुषार कामठे मुग गिळून गप्प बसले होते. आता त्यांच्या बदलीनंतर निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पत्रकबाजी करून नागरिकांत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे.”
🔹 शहरातील गंभीर समस्या असताना मौन का पाळले?
काळभोर यांनी पुढे सांगितले की —
निगडी ते पिंपरी मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या कामामुळे भक्ती शक्ती चौक ते मोरवाडी सिग्नलदरम्यान रस्त्यावर हजारो खड्डे निर्माण झाले.
२४ तास पाणीपुरवठा योजनेतील विलंब, रावेत बीआरटी मार्ग बंद पडलेला, आकुर्डी येथील जलतरण तलाव बंद अवस्थेत, तसेच निगडीतील धोकादायक इमारतींमधील नागरिकांचे स्थलांतर न होणे — या गंभीर विषयांवर तुषार कामठे एकदाही बोलले नाहीत.
“शहरातील २५६ फोटोपास धारकांना रेड झोनमधील पुनर्वसन क्षेत्रात नागरी सुविधा मिळाल्या नाहीत, परंतु त्या विषयावरही कामठे यांनी काहीही भूमिका घेतली नाही,” असे काळभोर यांनी सांगितले.
🔹 शरद पवार गटात गळती, आणि सुरू पत्रकबाजी
काळभोर यांनी पुढे म्हटले की,
“भोसरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटात मोठी गळती लागली. अजित गव्हाणे हे २६ माजी नगरसेवकांसह अजित पवार गटात दाखल झाले. त्यानंतर शरद पवार गटाने शहरातील समस्यांकडे पाठ फिरवली. आता आयुक्त गेले आणि निवडणुका जवळ आल्या म्हणून पत्रकबाजी सुरू आहे.”
🔹 छत्रपती संभाजी महाराज पुतळा प्रकरणातही मौन का?
काळभोर म्हणाले की —
“छत्रपती संभाजी महाराज पूर्णाकृती पुतळ्याच्या पादुकांना तडे गेले असताना कामठे आक्रमक झाले, पण काही महिन्यांपूर्वी ऐतिहासिक मानवंदना कार्यक्रम झाल्यावर मात्र ते गप्प राहिले. पुतळ्याचे काम अर्धवट असून एक हात बसविण्यात आलेला नाही, तरीही कार्यक्रम आयोजित झाला. या प्रकरणातही त्यांची भूमिका संशयास्पद आहे.”
🔹 पत्रकबाजी नव्हे – ठोस कामगिरी दाखवा
शहरात गेल्या काही वर्षांत वाढलेल्या नागरी समस्यांकडे लक्ष वेधत काळभोर म्हणाले —
“पिंपरी चिंचवडच्या खऱ्या प्रश्नांवर भूमिका घेण्याऐवजी पत्रकबाजी आणि दिखाऊ राजकारण सुरू आहे. नागरिकांना फसविण्याचे काम थांबवून शहराच्या विकासासाठी ठोस प्रयत्न करावेत.”
– सचिन काळभोर
माजी शहर चिटणीस,
भारतीय जनता पक्ष, पिंपरी चिंचवड





















































