पुणे – पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता अकरावी प्रवेशाच्या ३५ हजार ४९३ जागा रिक्त आहेत. गेल्या वर्षी २९ जुलै रोजी दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. त्यानंतर अकरावीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली. तीन नियमीत व दोन विशेष फेऱ्या राबविण्यात आल्या. ‘प्रथम येणाऱ्यास, प्रथम प्राधान्य’ या तत्वावरही काही प्रवेश फेऱ्या घेण्यात आल्या.
यातल्या शेवटच्या प्रवेश फेरीसाठी २६ मार्चपर्यंतची मुदत देण्यात आली. ती आता संपली आहे. प्रवेशापासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी अनेकदा संधी देण्यात आली. मात्र, तरीही प्रवेशाच्या जागा रिक्त राहिल्या आहेत. पुणे विभागात अकरावी प्रवेशासाठी ३०४ कनिष्ठ महाविद्यालयांनी नोंदणी केली होती. त्यात १ लाख ७ हजार २१५ एवढ्या प्रवेशाच्या जागा दर्शविल्या होत्या. प्रवेशासाठी १ लाख ३ हजार २०४ विद्यार्थ्यांची ऑनलाइन नोंदणी झाली होती. ८७ हजार ५३२ अर्ज भरल्यानंतर लॉक केले होते. ८७ हजार ४१४ अर्जांची पडताळणी पूर्ण झाली. ७१ हजार ७२२ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले. उर्वरित प्रवेश रिक्त राहिले आहेत.
करोनामुळे महाविद्यालये वर्षभर बंद आहेत. ऑनलाइन शिक्षण सुरू होते. बहुसंख्य विद्यार्थ्यांचे उशिरा प्रवेश झाले. त्यामुळे अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी शिक्षकांना कसरतच करावी लागली. आता परीक्षांची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने सर्वच विद्यार्थ्यांना अभ्यासाची तयारी ही करावीच लागणार आहेत.