अरबी समुद्रावर घोंगावणारे निसर्ग चक्रीवादळ बुधवारी कोणत्याही क्षणी मुंबईच्या किनारपट्टीवर धडकणार आहे. निसर्ग वादळाचे रौद्र रूप पाहून मुंबईकरांची धडधड वाढली आहे. वादळामुळे सखल भागात पुराचा धोका वाढला आहे. वादळाचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र, गुजरातच्या किनारपट्टीवर राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाच्या २१ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीने बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला असून, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली.
‘मुंबईसह अलिबाग, पालघरला वादळाचा धोका असल्यामुळे येथे महाराष्ट्र आपत्ती व्यवस्थापनाच्या तुकड्या आणि एनडीआरएफच्या १० तुकड्या तैनात करण्यात आलेल्या आहेत. मुंबईच्या किनारपट्टीवर तीन, पालघरला दोन तर ठाणे, रत्नागिरी, रायगड तसेच सिंधुदुर्ग येथे प्रत्येकी एक तुकडी तैनात करण्यात आली आहे. गुजरातच्या किनारपट्टीवरही ११ तुकड्या सज्ज आहेत असे एनडीआरएफचे प्रमुख जनरल एस. एन.प्रसाद यांनी सांगितले.
मुंबईच्या किनारपट्टीवर दुपारी पोहोचणार
‘निसर्ग’ सध्या मुंबईपासून ६७० किमी दूर आहे. बुधवारी दुपारपर्यंत ते मुंबईच्या किनारपट्टीवर धडकणार आहे. वारे ९० ते १०० प्रतितास किमी वेगाने वाहतील. वादळामुळे किनारपट्टीसह उत्तर मध्य महाराष्ट्राला मुसळधार पाऊस झोडपण्याची शक्यता आहे.