पुण्याला करोनाचा विळखा; ‘या’ बाबतीत मुंबई, ठाण्यालाही मागे टाकले!
पी पी सी न्यूज! प्रतिनिधी.
पुणे: राज्यात करोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वेगानं वाढत असून राज्याची सांस्कृतिक राजधानी पुण्याभोवती करोनाचा विळखा घट्ट झाला आहे. उपचार घेत असलेल्या करोना रुग्णांच्या संख्येच्या बाबतीत पुण्यानं मुंबई व ठाण्यालाही मागे टाकलं आहे. दुसऱ्यांदा लॉकडाऊन करूनही पुण्यातील संसर्ग आटोक्यात येत नसल्यामुळं प्रशासनाची चिंता वाढली आहे.
करोनाच्या साथीचा उद्रेक झाल्यापासून मुंबई, ठाणे व पुणे हे महाराष्ट्रातील हॉटस्पॉट ठरले आहेत. त्यात एकूण पॉझिटिव्ह रुग्णांच्या बाबतीत मुंबई पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर ठाण्याचा क्रमांक लागतो व पुणे जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. मुंबईत आतापर्यंत १ लाख १० हजार १८२ लोकांना करोनाची लागण झाली आहे. ठाणे जिल्ह्यात हा ८७,७९० इतका आहे. तर, पुणे जिल्ह्यात आतापर्यंत ७८,१३० लोकांना करोनानं गाठलं आहे.
एकूण पॉझिटिव्ह रुग्णांच्या बाबतीत पुणे जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर असला तरी उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या बाबतीत पुण्यानं मुंबई व ठाण्यालाही मागे टाकलं आहे. पुणे जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये सध्या ४८,६७२ रुग्ण उपचार घेत आहेत. ठाण्यात हा आकडा ३४,४७१ आहे. तर, मुंबईत केवळ २१,८१२ रुग्ण उपचार घेत आहेत. याबाबतीत पुणे जिल्हा राज्यात आता पहिल्या क्रमांकावर आहे. पालघर जिल्ह्यात ५६९५, नाशिक जिल्ह्यात ५१५२, रायगडमध्ये ४९२७ तर औरंगाबाद जिल्ह्यात सध्या ४,९०६ रुग्ण उपचार घेत आहेत.
रुग्ण बरे होण्याचं पुणे जिल्ह्यातील प्रमाण अवघे ३५ टक्के आहे. मुंबईत हेच प्रमाण ७४ टक्के तर ठाण्यात एकूण रुग्णांच्या प्रमाणात ५८ टक्के रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण करोनामुक्त होण्याचे सर्वाधिक प्रमाण गोंदियामध्ये आहे. तिथे ८८ टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.
उपचार घेणाऱ्या करोना रुग्णांच्या संख्येच्या बाबतीत पुणे जिल्ह्याने मुंबई व ठाण्याला मागे टाकले असले तरी येथील करोना मृत्यूची टक्केवारी तुलनेनं कमी आहे. पुण्यातील मृत्यूदर २.४ टक्के आहे. मुंबई व ठाण्याच्या तुलनेत हे प्रमाण कमी आहे. पुणे जिल्ह्यात आतापर्यंत करोनामुळे १८३८ मृत्यू झाले आहेत. ठाण्यात २३८६ रुग्णांचा बळी गेला आहे तर मुंबईतील हा आकडा सहा हजारांच्याही वर आहे.