नवी दिल्लीः- राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणांतर्गत उभारण्यात आलेल्या टोलनाक्यांवर महाराष्ट्रातील सर्व पत्रकारांना टोलमाफी, त्याचप्रमाणे या महामार्गावरुन प्रवास करताना अपघात होऊन मृत्यू आल्यास विमा कवच देण्याची घोषणा केंद्रिय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली. सिंधुदुर्गातील आजी-माजी पत्रकारांच्या शिष्टमंडळाने केलेल्या मागणीस अनुसरुन गडकरी यांनी संपूर्ण राज्यासाठीच हा निर्णय घेतल्याचे जाहीर केले. त्यामुळे राज्यातील पत्रकारांना आजपासून टोलमुक्त प्रवासाची संधी उपलब्ध होणार आहे. आमदार, खासदार, मंत्री, स्वातंत्र्यसैनिक यांच्याप्रमाणे पत्रकारदेखील समाजासाठी झटत असतात.
सर्वस्व देत असतात. जीव धोक्यात घालत असतात. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखला जातो. या पत्रकाराला त्याची सेवा बजावत असताना वारंवार राष्ट्रीय महामार्गावरुन प्रवास करावा लागतो. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील टोलनाक्यावर आपणास टोलमाफी मिळावी, या मागणीसाठी सिंधूदुर्गातील पत्रकारांच्या शिष्टमंडळाने माजी केंद्रिय मंत्री सुरेश प्रभू यांच्या नेतृत्वाखाली थेट केंद्रिय रस्ते, वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली.
या भेटीवेळी प्रभू यांनी सिंधूदुर्गातील पत्रकारांची मागणी कशी रास्त आहे. हे गडकरींना पटवून दिल्यानंतर केवळ सिंधुदुर्गातील पत्रकारांनाच नव्हे तर, राज्यातील सर्व पत्रकारांना टोलमाफी करीत असल्याची घोषणा गडकरी यांनी केली. त्याचबरोबर तसे आदेश काढण्याच्या सूचना सचिवांना दिल्या. त्याचप्रमाणे आपल्या या महामार्गावर जर कुणा पत्रकाराचा अपघाती मृत्यू झाला तर त्याला पाच लाखाचा विमा देण्याची घोषणाही गडकरी यांनी यावेळी केली तसेच ही सवलत फक्त अधीस्विकृतीधारक पत्रकारांनाच नव्हे तर सरसकट सर्वच पत्रकारांना देण्यात येणार असल्याची घोषणाही यावेळी करण्यात आली.