* ह.भ.प. चारुदत्त आफळे (राष्ट्रीय कीर्तनकार)
नाचू कीर्तनाचे रंगी !!
कीर्तन ही कला अशी आहे ज्यामध्ये परंपरा जपून संस्कृतीचा
प्रवाह टिकविला जातो. त्याचप्रमाणे प्रामुख्याने कीर्तनामध्ये राष्ट्रीय
कीर्तन, वारकरी कीर्तन आणि नारदीय कीर्तन असे संप्रदाय आहेत.
त्यापैकी नारदीय हा कीर्तन प्रवाह अति प्राचीन समजला जातो आणि
कालानुरूप कीर्तनाच्या परंपरेत बदल होत गेले आणि ते स्वीकारले
जाऊ लागले याचे कौतुक वाटते.
• कीर्तनाच्या काही आठवणी ?
आमचे मूळ गाव क्षेत्र माहुली हे होय. तिकडे उत्सवात मला प्रथम कीर्तनाला पोशाख
घालून लहानपणी वडिलांनी उभे केले. कीर्तनाच्या त्या वेळी मी सर्व पदे विसरूनच
गेलो. मग वडिलांनी पदे म्हटली आणि दोघांचे ते एकत्र कीर्तन ठरले. तसेच इंदोरच्या
कीर्तन महोत्सवात बऱ्याच दिग्गज कीर्तनकारांची कीर्तने सादर झाली. ते वातावरण
आणि प्रसंग अवर्णनीय आहेत. त्याचप्रमाणे माझे रत्नागिरीमध्ये कीर्तन होते ते सर्वात
लक्षात राहण्यासारखे झाले कारण एकतर रत्नागिरीला कोकणचा वेगळाच श्रोता असतो.
त्यावेळी दहा-पंधरा हजार लोक कीर्तनाला उपस्थित होते. मी आख्यानात शंभूराजे चरित्र
सांगितले. त्या समारोपानंतर आरतीची २ कडवी होईपर्यंत लोक त्या आख्यानातील मृत्यू
प्रसंगाच्या भावविश्वातून बाहेर आले नव्हते. हे खरे माझ्यासाठी अविस्मरणीय क्षण आहेत.
• वडिलांच्या काही आठवणी ?
माझे वडील गोविंदस्वामी आफळे यांच्या नावाने आम्ही दरवर्षी न चुकता पुण्यात ३
दिवसीय कीर्तन महोत्सव राबवितो. वडिलांचे व्यक्तित्व रांगडे, कडक, परखड, कीर्तन
देखील चपखल आणि प्रचंड वास्तवपूर्ण असायचे. लहानपणी एकदा त्यांना शाळेत
असताना त्यांच्या मास्तरांनी परीक्षेच्या काळात वर्गाबाहेर बसलेले पाहिले तेंव्हा नाना
म्हणाले, “पेन्सिल आणि पैसे नव्हते म्हणून मी पेपर नाही दिला.” त्यामुळे आमच्या
घरी आमच्यासाठी पेन्सिलींनी अगदी भरलेला डबा असे. माझे आणि वडिलांचे अगदी
मित्रत्वाचे नाते होते.
.कीर्तन कला आणि त्याविषयी काही ?
साहित्य, संगीत, नाट्य या सर्वांचा उगम असणारी कला म्हणजे कीर्तनकला आहे.
पूर्वीचे कीर्तन हे बहुतांशी वेदांतपूरक होते. कालानुरूप त्यात बदल झाले. नंतर संतकथा,
त्यानंतर राष्ट्र पुरुषांची चरित्रे आणि आता शास्त्रज्ञांची देखील चरित्रे आपण वापरतो.
पूर्वीच्या आख्यानातून कृष्णकथा, संतकथा व त्यानंतर वीरकथा आणि गाथा अशी
विचारधारा वाहते. उदा. प्रभू रामचंद्र ते सुभाषचंद्र. राष्ट्रीय कीर्तिचा कीर्तनकार हा तसा
एक शिक्का असतो पण, राष्ट्रीय किर्तनइतकेच किंबहुना देवभक्ती हा जास्त प्रधान विषय
आहे. पौराणिक कीर्तन ज्याला अध्यात्माचा परिपोष आहे ते म्हणजे देवभक्तीपर कीर्तन.
यात जन्माख्यान येते, त्याला अध्यात्माचं वलय असते. ऐतिहासिक कीर्तन म्हणजे
राष्ट्रभक्ती. क्रांतिकारकांच्या जीवनाचे चरित्र म्हणजे राष्ट्रीय कीर्तन होय.
• तरुण वर्ग आणि कीर्तनकला आणि त्या विषयानुरूप संदेश ?
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कीर्तन कलेच्या अनुषंगाने करावा. ज्यात आधुनिक
ज्वलंत समस्या उदाहरणार्थ एम.बी.ए., कन्हैयाकुमार, सावरकर, पाकिस्तान, ऐसिस
असे विषय ज्यात तरुणाई चर्चा करते त्यावर खुलेपणाने आपले मत मांडून योग्य मार्गदर्शन
करण्यासाठी कीर्तनकला साधन आणि व्यासपीठ आहे. त्याचा सुयोग्य वापर झाल्यास
तरुणवर्गात नक्की वैचारिक बदल घडेल. त्याचप्रमाणे ‘ठेविले अनंते तैसेचि राहावे, तुका
म्हणे घालू तयावरी भार’ ही तरुण पिढीची आताची अवस्था आहे. कर्तव्यसुद्धा देवानेच
करावे आणि फळ मात्र मला द्यावे ही भावना बदलण्यासाठी विवेकनंदाच्या “उठा आणि
जागे व्हा’ हा विचार कृतीत यायला हवा.
•समाज आणि कीर्तनकला ?
– डोंबिवली मधील एका मंदिराने शिव निर्माल्याचा उत्तम निर्धार केला की ते खत म्हणून
शोष खड्यात तयार केले आणि शेतकऱ्यांना दिले. देवाच्या बरोबरच शिव निर्माल्याचा
देखील पर्यावरण पूरक विचार व्हायला हवा. त्याचप्रमाणे, आजच्या धकाधकीच्या जीवनात
कालानुरूप कलेत सुद्धा बदल करून सुनिता विल्यम्स, कल्पना चावला, बाबा आमटे,
अब्दुल कलाम यांच्या व्यतिरिक्त अनेक थोर समाज सुधारकांची चरित्रे कीर्तनात समाविष्ट
करणे गरजेचे आहे. त्यांचे धैर्य, प्रयत्नशीलता असे विषय हाताळणे गरजेचे आहे. कीर्तन
कला ही अतिशय डोळस असून महाराष्ट्राची शान आहे. वेगवेगळे संप्रदाय यात येतात.
यासाठी व्यापक दृष्टीक्षेप हवा, प्रत्येक स्तरावरील माणसाने आत्मनिरीक्षण करायला हवे
आणि सकारात्मकतेने समाजाच्या कल्याणार्थ नुकसान सोसून पुढे सरकण्याची धमक
देखील सर्वच लोकात हवी त्यासाठी बळ हवे. प्रगतीला पारावर नाही हेच खरे.
– तन्मयी नचिकेत मेहेंदळे
(उपसंपादिका – पीपीसी न्यूज नेटवर्क, पुणे.)