महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावी परीक्षांचा निकाल अखेर नेमका कधी जाहीर केला जाणार याबाबतची अधिकृत माहिती समोर आली आहे.
बारावीचा निकाल १५ जुलैपर्यंत, तर इयत्ता दहावीचा निकाल जुलै महिन्याच्या अखेरीस जाहीर होणार असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत दिली.
निकाल जाहीर करण्याची प्रक्रिया सध्या सुरु असून १५ जुलैपर्यंत बारावीचा आणि जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत दहावीचा निकाल जाहीर करण्यात येईल, अशी माहिती राज्य शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष शकुंतला काळे यांनी दिली.
सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि शिक्षण विभागातील काही अधिकाऱ्यांची बैठक बोलवली होती. यावेळी निकालांची ताऱीख समोर आली. त्यामुळे दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.




















































