पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात आमदार शंकरभाऊ जगताप यांचे नाव आज ठामपणे उभे आहे. विधानसभा निवडणुकीतील विक्रमी मताधिक्य आणि महापालिकेतील यश यांमधून त्यांच्या नेतृत्वाला जनतेने दिलेली स्पष्ट दाद दिसून येते. हे यश केवळ राजकीय समीकरणांचे नसून, गेल्या तीन-चार दशकांपासून जनतेमध्ये रुजलेल्या विश्वासाचे फलित आहे. जगताप घराण्याने सुख-दुःखात लोकांशी नाळ जोडून ठेवली; त्यातूनच हा भक्कम जनाधार निर्माण झाला.
शंकरभाऊंच्या नेतृत्वात “धुरंधरपणा” स्पष्ट दिसतो—प्रश्न समजून घेण्याची क्षमता, प्रशासनावर पकड आणि योग्य वेळी ठोस भूमिका घेण्याची तयारी. विधानसभेत त्यांनी आरोग्य, पाणी—विशेषतः पवना धरणातून १०० एमएलडी पाणीपुरवठा, वाहतूक कोंडी, रुग्णहक्क, जिल्हा रुग्णालय सक्षमीकरण यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर सातत्याने आवाज उठवला. हे केवळ मुद्दे मांडणे नाही, तर अभ्यासपूर्ण नेतृत्वाची जाणीव करून देणारे काम आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास आणि जवळीक ही त्यांची ताकद आहे; मात्र खरी ताकद ही जनतेशी असलेल्या नात्यात आहे. कारण सत्तेतील जवळीक बदलू शकते, पण जनतेचा विश्वास टिकवण्यासाठी सातत्याने जमिनीवर राहावे लागते.
आजच्या घडीला शंकरभाऊ “धुरंधर” नेते म्हणून सिद्ध झाले आहेत; पण पुढचा टप्पा अधिक मोठा आहे—“लोकनेता” होण्याचा. यासाठी केवळ निर्णयक्षमता पुरेशी नसते, तर सहज उपलब्धता, साधेपणा आणि सर्वसामान्यांच्या भावनांशी जोडलेले राहणे आवश्यक असते. बडव्यांच्या गर्दीत हरवून न जाता, प्रत्येक कार्यकर्त्याला आणि नागरिकाला सहज भेटणारा, त्यांच्या अडचणी समजून घेणारा नेता म्हणून उभे राहणे हीच खरी कसोटी आहे.
राजकारणात पद मिळवणे महत्त्वाचे असते; पण लोकांच्या मनात स्थान मिळवणे अधिक मोठे असते. शंकरभाऊंनी आजवर केलेल्या कामगिरीने त्यांची वाटचाल योग्य दिशेने सुरू असल्याचे स्पष्ट होते. आता त्या वाटचालीला अधिक व्यापक आणि लोकाभिमुख रूप देण्याची वेळ आली आहे.
“धुरंधर” ही ओळख त्यांनी कमावली आहेच; आता जनतेच्या मनात घर करून “लोकनेता” होण्याची संधी त्यांच्या समोर उभी आहे. त्या दिशेने त्यांनी ठाम पावले टाकली, तर पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात एक नवा आदर्श निर्माण होईल.
ॲड अमोल पाटील
केंद्रीय उपाध्यक्ष
अखिल भारतीय डिजिटल मिडिया पत्रकार संपादक संघटना



















































