राज्य शासन माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय एक जुलैपासून सुरू करण्याच्या तयारीत होते. मात्र महाराष्ट्र राज्यात वाढत असलेला करोना बाधितांचा आकडा आणि खेडोपाडी करोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे पालकांची चिंता व आक्रोश यामुळे शासनाला त्यांच्या निर्णयावर फेरविचार करण्याची वेळ आली आहे.शासनाने निर्देशित केलेल्या नियमानुसार शाळा/ महाविद्यालयांनी पालकाकडून संमतीपत्र घेण्यास सुरुवात केली असता जवळपास 80 ते 82 टक्के पालकांनी शाळा/ महाविद्यालय सुरू केले तरी पाल्यांना पाठवण्यास सक्त विरोध दर्शविला असल्याने शासन स्तरावरील अधिकाऱ्यांचेही धाबे दणाणले आहेत.
काही निवडक अधिकाऱ्यांनी संबंधित यंत्रणेला चुकीचे मार्गदर्शन केल्यामुळे शाळा सुरू करण्याचा अट्टाहास सुरू केला गेला होता. परंतु अशा आणीबाणीच्या काळामध्ये शाळा / महाविद्यालय सुरू करून विद्यार्थ्यांच्या जीविताशी खेळण्याचा प्रयत्न अंगलट येऊ शकतो ही बाब सर्वांच्याच ध्यानात आली आहे.
काही अति-उत्साही पालक शाळा सुरू करण्याबाबत आग्रही भूमिका घेत होते. परंतु प्रत्यक्षात आपले स्वतःचे पाल्याला शाळेत पाठविण्याची संमती-पत्र देण्याची वेळ आली असता त्यांनी सपशेल माघार घेतल्याचे दिसत आहे. एकूणच, सर्वांनाच आपल्या लेकरांची /पाल्यांची काळजी असल्यामुळे कोणीही त्यांच्या लेकरांना/पाल्यांना सद्यस्थितीत शाळा-महाविद्यालयात पाठवण्यास तयार नाहीत. शासनस्तरावरून असेही निर्देशित केले गेले होते की, जेवढे विद्यार्थी शाळेत येतील तेवढ्यांना अध्यापन/शिकवणे सुरू करा. ८0 ते ९0 टक्के विद्यार्थी शाळेतच येणार नसतील तर त्यांच्या शैक्षणिक नुकसानाची जबाबदारी कोण घेणार ? याबाबत ही कोणाकडेही स्पष्ट उत्तर नसल्यामुळे आणखीनच गोंधळ उडत आहे.
शहरासोबत खेड्यापाड्यातील शाळेतही संसर्ग मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता दिसू लागली आहे. करोना चा संसर्ग आता शहरापुरता मर्यादित न राहता खेडोपाडी पूर्णपणे पसरला आहे. अशा परिस्थितीत शाळा/ महाविद्यालय सुरू करून विद्यार्थ्यांच्या जीविताशी खेळणे योग्य ठरणार नसल्यामुळे शासनस्तरावरून जुलै महिन्यात शाळा सुरू करण्याचा निर्णय ऑगस्ट महिन्यापर्यंत पुढे ढकलण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. याबाबत स्पष्ट आदेश सोमवार पर्यंत सगळीकडे देण्यात येतील असे कळते.





















































